विविध नागरी सुविधा कामांचा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जात असलेल्या नियोजित व सुरू असलेल्या नागरी सुविधा कामांची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने केली जात असून आज त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण व श्री.रमेश चव्हाण यांचेसमवेत वाशी, घणसोली येथील अमृत योजनेअंतर्गत केल्या जात असलेल्या विकास कामांची तसेच ऐरोली व दिघा भागातील कामांची पाहणी केली. या पाहणी दौ-यात शहर अभियंता श्री.मोहन डगांवकर, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. अमऱिश पटनिगेरे, वाशी विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके, सहा.आयुक्त श्री.दत्तात्रेय नागरे, श्री.तुषार बाबर व श्री. प्रकाश वाघमारे, कार्यकारी अभियंता श्री.अरविंद शिंदे, श्री.अनिल नेरपगार, श्री.शरद काळे व श्री. गिरीष गुमास्ते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

      या पाहणी दौ-यात आयुक्तांनी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृतया योजनेअंतर्गत वाशी, मिनी सी शोअर येथे तसेच सेक्टर 20 घणसोली येथील नाल्याशेजारी करण्यात येत असलेल्या हरित क्षेत्र विकास कामांची पाहणी केली. त्याठिकाणी जागेचे व्यवस्थित सपाटीकरण करणे तसेच आसपासचा परिसर सुशोभित राहील याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याठिकाणी असलेल्या मंदिराच्या पाठीमागील बाजूस सायकल ट्रॅक विकसित करणेची कार्यवाही करणेबाबत त्यांनी निर्देशित केले. घणसोली येथे अमृत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्यांनी बारकाईने पाहणी केली व तेथे वृक्षांच्या वाढीसाठी आवश्यक खत आणि पाणी कमी पडणार नाही याबाबात काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. महानगरपालिकेच्या केले जाणारे वृक्षारोपण व संवर्धन काम दर्जेदारच असले पाहिजे असे त्यांनी निक्षून सांगितले.

      अशाचप्रकारे सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील मैदानात असलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे उपकेंद्र सुरू करणेबाबत नियोजित संभाव्य जागेची त्यांनी पाहणी केली. दिघा येथे ग्रीन सिटी वर्ल्ड जवळील नाल्याची पाहणी करून नाल्यातील नैसर्गिक प्रवाहाला अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना करीत त्यांनी नाल्याच्या प्रवाहाला अडथळा आणणारी बांधकामे हटवून त्याठिकाणी पावसाळी कालावधीत सखल भागात पाणी साचण्याचा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश दिले. दिघा विभागातील ओ.एस.प्लॉटवर पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये मागणी होत असल्याप्रमाणे शिक्षण विभागाचे अभिप्राय घेऊन शाळांचे वर्ग सुरू करता येऊ शकतात काय? याची शहनिशा करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.    

नागरिकांकरिता पुरविण्यात येणा-या सुविधांची निकड लक्षात घेऊन त्यांची पूर्तता चांगला दर्जा राखून व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून त्या अनुषंगाने पाहणी करून सुविधा कामांना गती देण्यात येत आहे. 

Next Post