देव, ईश्वर , अल्लाह , गॉड किंवा अगदी निर्मिक या माणसाच्या डोक्यातून निघालेल्या सुंदर कल्पना आहेत. लाखो वर्षांपूर्वी मानव जेव्हा नुकताच आदिम आणि टोळी अवस्थेतून शेतीच्या निमीत्ताने समूहाने राहायला लागला. त्या काळात ज्या नैसर्गिक घटनांची गुपिते उलगडली नव्हती, त्यांना दैवी शक्ती मानण्याची सुरुवात झाली असावी, असे अभ्यासक मानतात. रानटी अवस्थेत असलेल्या मानवाला पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजा, नदीला येणारे भयंकर पूर, भयावह भूकंप आणि जंगलात लागणारे वणवे यामागील सत्याची जाणीव झाली नव्हती त्यामुळे या सगळ्या घटना कुणीतरी शक्ती घडवून आणते आणि तिला प्रसन्न केले की शांत होते, असा समज होणे स्वाभाविक आहे.
टोळ्यांच्या नागरीकरणाच्या प्राथमिक अवस्थेत टोळीच्या ताकदवान नायकाच्या डोक्यात कालांतराने दैवी शक्ती, देव आणि ईश्वराची कल्पना येण्याची अधिक शक्यता वर्तवली जाते. ताकदवान आणि बलाढ्य व्यक्ती कुणालाही घाबरत नाही, मात्र कुठल्यातरी अदृश्य शक्तीचा तो धसका घेतो. याचा अनुभवाने नायकांना प्रत्यय आला होता. वास्तवाचा सहज सामना करणारा माणूस काल्पनिक गोष्टीपुढें शरण जातो हे गुपित ज्यांना कळले त्यांनी सभोवतालच्या लोकांना त्याचा धाक दाखवून लुटीचे मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे नियोजन केले आहे. हेच नियोजन आताच्या आधुनिक काळातही विविध मार्गांचा वापर करून सुरु आहे. ज्या काळात कोणत्याही क्षेत्रात अभ्यास,प्रगती नव्हती अश्या काळात तयार झालेले हे लुटीचे गणित पुढे एवढे प्रभावी ठरेल आणि उच्च शिक्षित लोकही त्याला सहज बळी पडतील अशी अपेक्षा कदाचित कुणीही केली नसावी. आजच्या काळात देव, ईश्वर , गॉड आणि अल्लाह या चाणाक्ष व्यक्तींच्या प्रभावी ढाली बनल्या आहेत. लोकांना वास्तवापेक्षा कल्पनेच्या भराऱ्या आवडत असतात.
शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संत परंपरेतील काही निवडक संतांना या भुलभुलैयाची जाणीव झाली असावी, असे दिसते, त्यांनी अभंगातून त्याकडे अंगुलीनिर्देश केल्याचे दिसून येते. मात्र त्यांना याची शंभर टक्के खात्री होती असे वाटत नाही, असेलही, कदाचित समाजाला भक्तीच्या मार्गाने नेण्यासाठी त्यांनी जाणीव असूनही देवाचा आधार घेतला असावा असे दिसते. संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखोबा यांनी तर काही अभंगातून थेट देवाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारले आहेत. काही संतांनी व्यक्तीच्या मनाच्या सामर्थ्याचा अभ्यास करीत हे प्रयोग म्हणजे मानवाच्या मनाचे कसे खेळ असतात याचीही मांडणी करून ठेवली आहे. पुढे मानसशास्त्रात मोठे संशोधन झाल्यावर मेंदूच्या आज्ञा आणि त्याचे आपल्या जीवनावर,व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम यावर सुद्धा अभ्यास होऊन सगळ्या खेळी मन म्हणजे आपला मेंदू कसा करीत असतो आणि त्यालाच आपण दैवी कृपा मानून जगत असतो हे सिद्ध झाले आहे.
तसाही आपल्या जीवनात देव, ईश्वर यांचा काहीही संबंध नसतो, त्यांच्याशिवाय आपले काहीही बिघडत नाही. वयाच्या विसाव्या वर्षात मला देवाचे गौडबंगाल लक्षात आल्यावर तेव्हापासून माझ्या जीवनातून ही संकल्पना हद्दपार झाली आहे, गेली ३५ वर्ष माझे जीवन अतिशय व्यवस्थित सुरु आहे, मला कधीही देवाचा सहारा घेण्याची गरज पडली नाही. माझ्या घरात कधीही देव्हारा,देवाच्या तसबिरी किंवा धार्मिक कार्यक्रम झाले नाहीत आणि त्यावाचून आमचे कधी काहीही अडले नाही. मी स्वतःला विज्ञानवादी मानतो आणि आर्वजून सगळ्या मंदिरात जातो पण दर्शन करावेसे वाटत ही कारण त्याच्या निर्मितीची प्रक्रिया आवश्यक त्या वयात उलगडली आहे. उगाच स्वतःला नास्तिक मानीत देवभोळ्या लोकांची घृणा करणे किंवा पराकोटीचा तिरस्कार करावासा मला कधी वाटले नाही ,कारण देव,धर्म किंवा सतत कर्मकांड करणारे समूह मानसिक आजारी असतात आणि आजारी व्यक्तीचा तिरस्कार करीत नसतात हे मानवतेचे सूत्र आहे.
पूर्वी शिक्षणाचा अभाव होता म्हणून समाज देवभोळा झाला मात्र शिक्षणाचे प्रमाण वाढत गेल्यावर त्याचा टक्का कमी झाला नाही उलट जास्त शिकलेला वर्ग अधिक त्या खाईत लोटला गेला आहे. म्हणून शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा आपसात काहीही संबंध नसतो हे सूत्र कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे. लाखो व्यक्ती केवळ पुस्तकी ज्ञान मिळवत शिकत जातात,उच्चशिक्षित बनतात मात्र त्यांच्यात विवेक,वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. आपल्या समाजात ज्यांनी कधी शाळेचे तोंडही बघितले नाही असे संत गाडगेबाबा विवेकी आणि विज्ञानवादी बनतात आणि घराबाहेरील पाटीवर डिग्र्या मावत नाहीत असे विद्वान कर्मकांडाच्या आहारी गेलेले असतात तेव्हा हा लोच्या लक्षात येतो. या जगातील सगळेच धर्म आणि धर्मग्रंथ मानवाने निर्माण केलेले आहेत हे साधे गणित अनेकांच्या भाराभर पदव्यांनी अजूनही सोडवले नाही. उलट वारकरी संप्रदायाच्या अनेक संतांनी सोप्या भाषेत हे कोडे सोडवून टाकल्याचे लक्षात येते.
पैसा, संपत्ती आणि अगाध ज्ञान व्यक्तींना मानसिक कमकुवत करीत जाते, ती अधिक परावलंबी होते ,त्याचाच फायदा घेत अशा समूहांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी चाणाक्ष घटक टपून बसलेले असतात. लोकांना देव,धर्म आणि काल्पनिक प्रश्नांवर मानसिक गुलाम केले जाऊ शकते याचे जगभर प्रयोग झालेले आहेत.; त्यामुळे देव,धर्म आणि कर्मकांडाच्या नादी लागलेला समाज अश्या चाणाक्ष लोकांचे कायमच खाद्य बनलेला असतो. दुर्दैवाने आपल्या देशात हेच सुरु आहे. सार्वजनिक जीवनात मूठभर लोकांना देव,धर्माचे कोडे सुटलेले असते. मात्र धंदा है पर गंदा है या न्यायाने हे मूठभर सेक्युलर लोकही आपले खाद्य मिटक्या मारीत खाताना दिसतात.
– पुरूषोत्तम आवारे पाटील
संवाद – ९८९२१६२२४८
000000000000000000
नवी मुंबई लाईव्ह वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी Navimumbailive.com@gmail.com
या मेल आयडीवर मेल करावे अथवा ८३६९९२४६४६ या क्रमाकांवर मजकुर व फोटो व्हॉटसअप करण्यात यावे.