नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्यांची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
अवकाळी पावसाने महाराष्ट्रात धुमाकुळ घातला असून नवी मुंबईतही त्याचा तडाखा बसला आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला बेलापूर विभाग जलमय होवून वाहने पाण्याखाली गेली, दुकानांमध्ये पाणी घुसले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहिवाशांना मात्र पावसाच्या तडाख्यामध्ये शौचाच्या पाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागला आहे. पहिल्याच पावसात सेक्टर सहामधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होवून त्यातील पाणी ठिकठिकाणी रस्त्यावर वाहत होते. विशेष म्हणजे पाऊस गेल्यावरही काही ठिकाणी अजूनही मल:निस्सारण चेम्बर्समधून पाणी वाहत आहे. पावसाळीपूर्व कामांचा भाग असलेल्या मल:निस्सारण वाहिन्यांची साफसफाई न झाल्याने हे प्रकार घडत आहेत. लोकांना पाऊस गेल्यावरही मल:निस्सारणच्या चेम्बर्समधून रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांना याच सांडपाण्यातून ये-जा करावी लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता व आठवड्यावर आलेला पावसाळा पाहता युद्धपातळीवर परिसरातील मल:निस्सारण वाहिन्यांची साफसफाई करण्याचे व चेम्बर्समधील कचरा तातडीने काढण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.